Posts

Showing posts from October, 2015

खुप आवाज आहे..

खुप आवाज आहे.. वापरुन गुळगुळीत झालेल्या शब्दांचा. उडणाऱ्या म्हशींचा थवा छटाहीन हंबरतो आहे घश्याच्या शिरा ताणून. व्हॉट्सपच्या ईमोजी भाषेच्या खांबाला बांधलेल्या शब्दांभोवती फेर धरुन नाचताहेत भीषण. बोलण्याची असंख्य साधनं जमा करुन एकटा माणूस उभा आहे बेदम भांबावून. खुप आवाज आहे.. माझ्या डोक्यात.. खुप आवाज.. खुप..

पुत्र व्हावा ऐसा पढाकू

Image
ऎसी अक्षरे (२०१५)साठी लिहीलेला हा लेख ( http://aisiakshare.com/node/4133), इथे परत डकवत आहे- सोप्या गोष्टींबद्दल लिहिणं फार कठीण असतं हे वाक्य अनंत वेळा वाचूनही टोचत नाही, जोपर्यंत ती वेळ तुमच्यावर येत नाही. आज ही वेळ माझ्यावर आणल्याबद्दल संपादकांचे आभार मानावेत की त्यांना बोल लावावेत हा प्रश्नच आहे. भा. रा. भागवतांची पुस्तकं आनंदानं वाचणं वेगळं आणि त्यांच्या लिखाणाचं तथाकथित मूल्यमापन करणं वेगळं. आज मागं वळून बघताना जाणवतं, की भारांचं स्थान तेच आहे जे आपल्या आवडत्या मावशीचं, दादाचं, आजीचं असतं. तिथं डावं-उजवं करताना मनात एक हळवा कोपरा आधीच तयार झाला असतो. भारांच्या लिखाणाचं मूल्यमापन करताना हा दुसरा अडथळा! असो. प्रयत्न करण्यात फिजूल मुजोरी कशाला? मराठी साहित्याच्या मर्यादित परिघात आपण असंख्य वर्तुळं आखून ठेवली आहेत; विविध साहित्यप्रकार (कथा, कादंबऱ्या, कविता, लघु-दीर्घ कथा, कविता, प्रवासवर्णनं, इ. इ.) हे सर्वात मोठं क्लस्टर. त्यातही आपण दलित-बहुजन-ब्राह्मणी, शहरी-ग्रामीण, पुरुष-महिला, प्राचीन-अर्वाचीन, पश्चिम महाराष्ट्रातलं-विदर्भाकडचं-वऱ्हाडी-मराठवाडी-खानदेशी, बालसाहित्य-कुमारसा

॥प्रश्नचिन्हाखालचं चहाटळ टिंब॥

Image
रेषेवरची अक्षरेसाठी, २०११मधे लिहीलेला हा लेख ( http://reshakshare.blogspot.in/2011/10/blog-post_4998.html), इथे परत डकवत आहे- विक्रमानं डोळ्यांवर आलेल्या बटा ’फूऊऊ’ करून मागे सारल्या , धपापत्या उरांच्या नायिकांसारखा श्वास उगाच घेतला न्‌ सोडला आणि जंगलात सरळ रेषेत चालायला लागला . सरळ रेषा म्हणजे द्विमितीय भूमितीत दोन बिंदूंमधलं लघुत्तम अंतर . काळेकाकू कोर्टाचे कागद कात्रीने कराकरा कापतात , तसं विक्रमाने ते अंतर तडफेने कापलं आणि झाडावरचा वेताळ खांद्यावर लादून तो तडक वापस निघाला . रस्त्यात वेळ जाण्यासाठी वेताळ विक्रमाला ’गोष्ट सांगतो’ म्हणाला . बोलणार्‍याचं तोंड कोण धरणार ? अट फक्त एकच होती की , विक्रमानं मौनव्रत पाळायचं . विक्रमानं तंबाखूची गोळी दाढेखाली सरकवली आणि तो प्रसन्नपणे हसला . मौनव्रत त्याच्या सरावाचं होतं , शेवटी तो एक राजाच होता .   ॥गोष्ट १॥ "फार फार विचित्र गोष्ट आहे . अड्डम नावाचा एक माणूस इव्ह अश्या विचित्र नावाच्या बाईसोबत राहात असे . इव्हचं खरं नाव संध्या असू शकतं , शांतारामबापूंची नव्हे , त्याहून जीर्ण . पण गोष्टीत इंग्रजी नावं . इंग्रजी कातडी लोका