Posts

Showing posts from 2013

अनहत स्वगतांचे ढळणारे प्रतिध्वनी

॥ थोडं नंतर॥ रात्री ११ ते सकाळी ९ ही सर्वात वाईट ड्युटी. बरेच लोक ड्युटी आणि वाईट हे समानार्थी शब्दच समजतात. रिझवान सिद्दीकीनं घड्याळाकडं हताशपणे बघितलं. बरेच लोक घड्याळ आणि हताशपणा यांनाही समानार्थी शब्द समजतात. घड्याळाचा काटा फकाटपणे हात पसरवून हॉ... करत गेला कित्येक वेळ पावणेतीनचीच वेळ दाखवत होता. खास पोलीस स्टेशनातच वाजु शकतो तसा अश्या भलत्यावेळी रिझवान समोरचा फोन खणखणला. "सर, मॉलसिटी बीट मधून जमाल बोलतोय" विलक्षण उत्तेजित आवाजात जमाल कमालीचा भरभर बोलत होता "इथे अल-बुर्जच्या तीसाव्या मजल्यावरुन एक बाई पडलीए म्हणजे तिला फेकलय असा एका बाईचा फोन आला होता म्हणजे तिनंच फेकलय म्हणे" "जमाल, बाई पडलीए की फेकलीए? आणि मग ती फोन कसा करेल?" रिझवान आवाजातली उत्सुकता दाबत म्हणाला. भिंतीवरची दुबईच्या राजाची तस्वीर त्याच्याकडे बघून उगाच दाढीत हसली. "सर" जमालच्या फुफ्फुसात आता पुरेशी हवा जमली होती "अल-बुर्जच्या तीसाव्या मजल्यावरुन आपण एका बाईला ढकललं असा सांगणारा एका बाईचा फोन आला होता. तिला तिथंच थांबायला सांगून मी तुम्हाला फोन केला. बीट व

मराठी कथेचं कृष्णविवर आणि परिघावरचा वाचक

निमित्त- लोकसत्तेमध्ये आलेला रेखा इनामदार-साने (कथा आक्रसते) आणि राजन खान ( कथा टिकून राहील ... ) यांचा मराठी कथेबद्दलचा उहापोह सर्वसाधारणपणे आपल्याकडे वाङमयीन चर्चेचा एक बाज असतो; कधी आपण शैलीची चर्चा करतो, कधी ग्रामीण-शहरी-दलित-महिला अश्या वर्गीकरणात रमतो, कधी रवीकिरण-दुर्बोध-नव इ. शब्दछलात गुंततो तर क्वचित अभ्यासु लेखक असलाच तर ऍरिस्टॉटल, जंग, फ्राऊ, भरतमुनी यांच्या चष्म्यातून आपण आपली पुस्तकं पाहातो. समिक्षेसाठी तटस्थता आणि अभ्यास आवश्यक आहेच पण तटस्थता म्हणजे कोरडेपणा नाही. लेखन प्रक्रियेत जवळ जवळ शुन्य सहभाग असणाऱ्या वाचकाचा वाचण्याच्या क्रियेत मात्र १००% सहभाग असतो. मग मराठी कथा-कविता-कादंबरी इ. च्या स्थित्यंतराचा अभ्यास करताना वाचकाच्या भुमिकेचा विचार करायला हरकत नसावी. वाचणाऱ्यांच्या जगात पडलेल्या फरकाचा विशेषतः कथेवर कसा परिणाम झाला असावा याचं हे अनुमान. वाचणाऱ्यांचे मी माझ्यासोईसाठी दोन गट पाडतो; नवशिक्षीत आणि सुशिक्षीत. सुशिक्षीत- दोन पिढ्यांहून जास्त साक्षर असणारी कुटूंब आणि वाचन म्हणजे वर्तमानपत्र आणि पाठ्यपुस्तक या पलीकडंच जग. नवशिक्षीत - दोन किंवा निव्वळ

मुलीचे दत्तक विधान

॥ विधान १॥ ऋतुपर्ण झाडांच्या पानांमध्येच असतो पाऊस. निमित्तांचे ओलावे घेऊन गंधमग्न धारा झरझर झरतात तेव्हा झाडांचे डोळे झिम्मड होतात. पापण्या बनून पानेही समंजसपणे पावसाळ्यात आतला पाऊस मिसळून टाकतात. एका स्वरावलीवर हलकेच दुसरी स्वरावली चढवावी आणि आत्मसमर्पणाला लिरिकल सुसाईडची नवी परिणामे द्यावी तसे झाडांचे वागणे. नैमित्तिक बांधिलकी पल्याड जाऊन जंगल न्याहाळावे तर झाडे कलमही होतात अंगाखांद्यावर. आपल्या बाहेर जंगल असते आणि आता आतही. पण झाडांसारखे निश्चल नार्सिस्ट उभे ठाकू शकत नाही आपण अनंत काळ. तळपायावरचा तीळ भोवऱ्यात गरगरण्याआधी मला या जंगलातून निर्वासित व्हायचं असतं. मुलींनो, आपली ओळख नेमकी तिथली... माझ्या हाडांच्या प्रस्तरावरचे सारे संदर्भ पानांमधून झुळझुळणाऱ्या आदी संगीताचे, आकाशी मौनाच्या भाषेचे, नदीच्या निळसर अवतरणाचे. पण किती अनोळखी तुमच्या जगतातील अर्वाचिन लिपी ... शब्द शब्द अब्द अर्थ, प्रकांड विरामचिन्हे अन शुन्य निरर्थ. अंब, हाताला धरुन धान्याच्या राशीत रेखविलीस मुळाक्षरे, उरफाट्या गणितांची पाखरे, साक्षर माझे दिवस-साक्षर माझ्या रात्री. संथपणे कागदासारखे निरक्षर माझे अ

आईने के उस पार...

तसं बघितलं तर मला चरित्र, आत्मचरित्र इ. प्रकार फारसा आवडत नाही. ज्या वयात पुस्तकं वाचायला सुरुवात केली त्या वयात पुस्तकात सतत काही तरी घडलं पाहीजे असं वाटणं फार नैसर्गिक होतं. त्यामुळे आत्मचरित्रांचा संथ आणि पसरट पसारा तेव्हा नाही आवडला तो नाहीच आवडला. पण गंमत म्हणजे गंभीरपणे वाचायला सुरुवात केल्यावर वाचलेल्या पहील्या दोन-तीन पुस्तकात गाडगीळांची ’दुर्दम्य’ होती. पण हा अपवाद. त्या नंतर किती तरी वर्ष या प्रकाराच्या वाटेला मी कधी गेलो नाही. नाही म्हणायला लोकवाङमयची आणि तशीच रुपडं असणारी इतर प्रकाशनांची डार्वीन, मेरी क्युरी, युरी गागारीन वगैरे शास्त्रज्ञ तत्सम मंडळींच्या पुस्तकांचा फडशा पाडणं सुरु होतं पण त्यांना नेमकं चरित्र म्हणता येईल का ही एक शंकाच. मग एका उन्हाळ्याच्या सुटीत, कदाचित सातवीच्या उन्हाळ्याच्या सुटीत, गंभीरपणे चरित्र वाचण्याचं फर्मान निघालं. गाढव वयात गाढव विचार असतात (असं थोड्या थोड्या वर्षांनी मागं वळून पाहीलं की परत परत वाटतं हा एक वेगळा विषय!). गांधी, आंबेडकर इ मंडळी कुठल्याही विशिष्ट कारणाशिवाय शत्रुपक्षात होती. विचारसरणी, तत्वज्ञान शब्द फार मोठे होत पण उगाच मत बनवणं

भुताडी झांपा

टीव्हीवर दाखवतात तश्या सुहासनं स्टंपपासून ढांगा मोजल्या आणि हातातल्या बॉलला थुंकी लावावी की नाही याचा क्षणभर विचार केला. रोंगट्या गेल्या तीन ओवर आऊट होत नव्हता. सुहासनं पाचही बोटं तोंडात घातली. मळकट रबराची चव तोंडात घोळली आणि टपकन ओलेता बॉल एक टप्पा खाऊन नेमका रोंगट्याच्या बॅटवर पडला. रोंगट्यानं त्याच्याही नकळत बॅट फिरवली आणि बॉल बी-बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावर ३०३च्या गॅलरीत जाऊन पडला. तोंडावर हात दाबला तरी पोरांच्या तोंडून अस्फुट किंकाळी फुटलीच. बॉल भुताडीच्या गॅलरीत पडला होता. भुताडीच्या घरातून काहीच बाहेर पडत नाही ...माणूस सुद्धा... असा सोसायटीतल्या पोरांमधे प्रवाद होता! हा निदान चौथ्या बॉलचा बळी होता. ... श्रीनं अस्वस्थपणे कुस बदलली. मोठं होणं म्हणजे नक्की काय हे त्याला काही केल्या कळत नव्हतं. परवाच्याच सातव्या वाढदिवसानंतर आई-बाबांनी त्याला आता तो मोठा झालाय हे स्पष्ट सांगीतलं होतं. मोठं होणं म्हणजे खेळणी कपाटात भरुन ठेवणं, शाळेची बॅग झालंच तर कपडेही आवरुन ठेवणं असं असेल तर मोठं होणं वट्ट बोर होतं. मोठं होण्यात मजा असते जेव्हा टीव्ही बघत कधीही लोळत पॉपकॉर्न खाता येतात किंवा

साहित्यिक भौ- तेरी कहके ले ली रे बावा

म्हणजे संपलंच म्हणायचं एकदाचं! संमेलनाचं सुप वाजलं हा वर्तमानपत्रवाल्यांचा लई लाडका शब्द. तर तेही वाजून झालं. हल्ली होतं काय आहे की संमेलनाच्या अध्यक्षांची ओळख दिपिका चिखलीयापेक्षाही कमी असते. म्हणजे जे काही बापडे मराठी य्मयेच्या वाटेला गेलेले असतात केवळ तेच अध्यक्षांना साहित्यिकली ओळखु शकतात. आता या उत्सवांना एकदा श्टार व्हॅल्यु नाही म्हटलं की विचारतं कोण? अध्यक्षांनं एक तर लोकप्रिय तरी असावं किंवा समिक्षकप्रिय तरी...रमेश मंत्री, (गेले बिचारे) इंदिरा संतांना हरवुन (!!) अध्यक्ष झालेच होते की. त्यानं होतं काय की एक तर त्यांचा मेशेज जनमनात पोचतो किंवा मायमराठीच्या विचारधारेत ते कसली तरी भर पाडतात. आता काय एकूणच दोन्ही बाबतीत आनंद. जेव्हा पासून वेडा डब्बा आला, डब्बेवाल्या काकांनी ठरवुनच टाकलं की लोकांना जड, गंभीर काही म्हणजे काही पचत नाही. त्याच चालीवर संमेलनातल्या गंभीर परिसंवादांना फाटा मारण्यात आला. यावेळी म्हणे राजकीय नेत्यांसाठी माझं वाचन की कायसा परिसंवाद ठेवला होता. त्याला बहुतेक बगळ्यांनी दांडी मारली. साहाजिक आहे. राजकारणात टिकायचं म्हणजे साहित्यवगैरे विषयांपासून दुर असलेलं ब

आईराजा उदो उदो

आठवणींचा नुस्ता काला झालाय. नियमांचे गारगोटी अट्टहास होण्याआधीच्या देवी तुझ्या आठवणी, देवी तुझा गोंधळ. सातलाच रात्र व्हायची, लाईटीचे निव्वळ अपवाद, आग्रहही नसायचाच, लोक तसे समजुतदार होते. गोंधळाच्या रात्री मग तेलाचे पलिते पेटायचे. सरगाठ, निरगाठ, आतली गाठ, सगळं सगळं आवळुन आराधी, आराधणी जुन्या साड्यांचे पलिते बनवायचे. पलिते, घट्ट, सापासारखे, भप्पकन पेटून उठायचे नाही पण धुमसत राहायचे, रात्रभर. आराधी एरवी म्युन्सीपाल्टीत गटारगाडा ओढायचा पण नवरात्रात आकाशी निळ्या रंगाचा नेहरुशर्ट घालायचा. बघावं तेव्हा नशेत असल्यासारखे डोळे चढलेले, केस खांद्यावरुन खाली ओघळलेले, त्याच्याशी एक वाक्य बोलायचं म्हटलं की पाक्पुक व्हायचं. पण त्याच्या हलगीचं भारी आकर्षण. हलगी चढव्हायला आगीवर शेकावी लागायची. ताणलेल्या कातड्यावर फटकारलं की आवाज होतोच. कॅलिडास्कोप थोडा फिरवला की मला सुभाषदादाचा भाऊ आठवतो. भिमसेनांकडे शिकायचा. उन्हाळ्यात तो आला की रात्री गाण्यांची मैफल जमायची. सर्वात शेवटी त्याला कुणीतरी जोगवा म्हणायचा आग्रह करायचा. पेटी-तबला बाजुला सारुन भली मोठी परात तो उपडी घालायचा आणि त्यावर त